महाराष्ट्र

ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुटल्यानंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं. बहुतांश आमदारांनी अजित पवारांना साथ दिली. पण मुरब्बी शरद पवारांनी हार मारलेली नाही. राजकारण कोळून प्यायलेल्या काकांनी पुतण्याला चितपट करण्यासाठी एका पाठोपाठ एक डाव टाकायला सुरुवात केली. तर काकांच्याच तालमीत तयार झालेले अजित पवारही कसलेल्या पैलवानासारखे लढत देत आहेत. या लढतीचा निकाल ४ जूनला लागेल. पण प्रतिष्ठेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना काका, पुतण्याचा पॅटर्न सेम असलेला दिसतोय. काही दिवसांपूर्वी काकांना प्रत्युत्तर देताना अजित पवारांनी ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असतात, असं म्हटलं होतं. त्याचा प्रयत्न दोघांचे राजकीय डावपेच पाहूनही येतोय.

अजित पवारांसह अनेक निकटवर्तीय नेत्यांनी साथ सोडल्यानंतरही शरद पवार अनेक जागांवर अजूनही रेसमध्ये आहेत. सत्तेत असलेल्या भाजप, राष्ट्रवादीतील नाराजांना हेरुन शरद पवार बेरजेचं राजकारण करत आहेत. शरद पवारांनी आतापर्यंत १० जागांवर उमेदवार दिले आहेत. पैकी ५० टक्के जागांवर त्यांनी आयारामांना संधी दिली आहे. तर अजित पवारांनी आतापर्यंत चार जागांवर उमेदवार दिले आहेत. पैकी दोन उमेदवार आयाराम आहेत.

एकेकाळी शरद पवारांचे निकटवर्तीय राहिलेले, उपमुख्यमंत्रिपद भूषवलेले विजयसिंह मोहिते पाटील २०१९ मध्ये भाजपसोबत गेले. सोलापूरमधील बडं प्रस्थ असलेलं मोहिते पाटील कुटुंब गेल्या काही दिवसांपासून नाराज होतं. भाजपनं माढ्यातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिल्यानं मोहिते पाटील नाराज होते. हीच नाराजी ओळखून पवारांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील यांना पक्षात घेतलं. त्यांना माढ्यातून उमेदवारी दिली.

अजित पवार गटातील आमदार निलेश लंकेंनीदेखील शरद पवार गटात परतत नगरमधून उमेदवारी मिळवली. रावेरमधून शरद पवारांच्या पक्षाकडून लढत असलेले श्रीराम पवार राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप असा प्रवास करुन आलेले आहेत. याशिवाय शरद पवारांनी वर्ध्यात अमर काळे (आधी काँग्रेसमध्ये), भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रे, बीडमध्ये बजरंग सोनावणेंना उमेदवारी दिली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आतापर्यंत रायगड, शिरुर, बारामती, धाराशिवमध्ये उमेदवार दिले आहेत. पैकी बारामती, रायगडचा अपवाद वगळता अन्य दोन जागांवर अजित पवारांनी आयारामांना तिकीट दिलं आहे. शिरुरमधून सेनेतून आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना, तर धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. अर्चना पाटील निवडणूक लढवण्यासाठी भाजपमधून राष्ट्रवादीत आल्या आहेत.