महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठा भूकंप

मुंबई – काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वावर हल्लाबोल केला. तसेच, लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसतील असे सुतोवाचही त्यांनी केले. लोकसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रात आणखी मोठे राजकीय भूकंप होतील. बरेच नेते मोठा निर्णय घेतील, सगळे मोठे नेते सोडून जात आहेत, असा दावाच अशोक चव्हाण यांनी केला आहे. संजय निरुपमसारखा चांगला नेता गेला, मिलिंद देवरा.. असे असंख्य नेते जे नाराज, अस्वस्थ आहेत. ज्यांना आपल्या भविष्याची चिंता आहे, ते लवकरच योग्य निर्णय घेतील याची मला खात्री असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. यावेळी, आपण काँग्रेस पक्ष सोडण्यामागे नेमकं राजकारण काय घडलं, याचाही उलगडा करताना, उद्धव ठाकरे व शरद पवार यांचं राजकारणही सांगितलं.

अशोक चव्हाण यांनी सध्या भाजपातील परिस्थिती आणि काँग्रेसची बिकट अवस्था यावर भाष्य करताना अनेक प्रश्नांवर दिलखुलासपणे उत्तरे दिली. भाजपमध्ये मला पूर्ण मानसन्मान मिळत असून पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी पक्षाने दिली, ती मी चोखपणे पूर्ण करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा माझा हात धरत लोकांना अभिवादन केलं, तो क्षण माझ्यासाठी अमूल्य होता.तसं पाहिलं तर, मी मोदीजींना पक्षात येण्याआधीही बऱ्याच वेळेला भेटलो आहे. पण, बऱ्याच भेटींबद्दल कॅमेरासमोर बोलता येत नाही, असे म्हणत भाजपात आपण पूर्णपणे समाधानी असल्याचं खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं. तसेच, देशात मोदी सरकार आणि राज्यात महायुतीचं सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.