महाराष्ट्र

वाढत्या क्षयरोगाबाबत तंत्रज्ञानाची आवश्यकता

मुंबई – क्षयरोग रुग्णांमध्ये औषध प्रतिरोधकता वाढू लागल्याने अनेक रुग्णांना बरे होण्यास विलंब लागत आहे. मात्र जनुकीय क्रमनिर्धारण उपचार पद्धत ही क्षयरोग रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, औषध प्रतिरोधकातील बदल समजून घेण्यास मदत होत असल्याचे नुकत्याच एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

क्षयरोग हा जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा संसर्गजन्य रोग आहे. भारतात २०२० मध्ये क्षयरोगाचे २.९५ दशलक्ष रुग्ण सापडले, यापैकी १ लाख ३५ हजार रुग्ण बहु-औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे होते. क्षयरोगावरील उपचार दीर्घकाळ चालणारे आणि त्रासदायक असल्याने अनेक रुग्ण ते अर्धवट सोडतात. त्यामुळे बहु-औषध प्रतिरोधक रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अशा रुग्णांवर पुन्हा उपचार करणे अवघड होते. या रुग्णांवरील उपचारासाठी जनुकीय क्रमनिर्धारण ही उपचार पद्धती महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे संशोधन पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि आयआयटी मुंबईची जनुकीय क्रमनिर्धारणाबाबत कार्य करणारी हेस्टॅक ॲनालिटिक या जीनोमिक्स डायग्नोस्टिक सोल्यूशन्स संस्थेने केले आहे.

वाढत्या क्षयरोगाबाबत डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि हेस्टॅक ॲनालिटिक यांनी केलेल्या संशोधनामध्ये ६०० औषध-प्रतिरोधक क्षय रुग्णांच्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण केले. यामध्ये क्षयरोगासाठी प्रतिजैविक म्हणून पहिल्या टप्प्यातील रिफॅम्पिसिन, आयसोनियाझिड आणि श्वसन आणि मूत्रमार्गाच्या संसर्गासाठी दिल्या जाणाऱ्या फ्लूरोक्विनोलोन या औषधांना प्रतिरोध होत असल्याचे आढळून आले. तर पूर्व औषध प्रतिरोधक क्षय (प्री एक्सडीआर टीबी) हे ५०.८३ टक्के रुग्णांमध्ये तर औषध प्रतिरोधक क्षय (एमडीआर-टीबी) १५.५ टक्के रुग्णांमध्ये आढळून आले. तसेच १५ ते ३५ वयोगटातील ५५ टक्के, तर १४ वर्षे वयोगटातील ६७ टक्के रुग्णांमध्ये एक्सडीआर क्षय आढळून आला. बेडाक्विलिनसारख्या नवीन औषधांनाही प्रतिकार होत असल्याने जनुक्रिय क्रमनिर्धारणसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.