देश

नवनीत राणांची निकालाआधीच वाढली चिंता

अमरावती – राज्यात पाच टप्प्यात लोकसभेच्या 48 जागांसाठी मतदान पार पडले आहे. आणि येत्या 4 जूनला येणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी निकालाआधी अनेक अंदाज बांधले जातायत. यामध्ये अमरावती लोकसभा मतदार संघात मोठा उलटफेर होण्याचा अंदाज सट्टा बाजाराने वर्तवला आहे. अमरावतीतून भाजपच्या तिकीटावर लढणाऱ्या नवनीत राणा यांचा पराभव होण्याचं भाकित सट्टा बाजाराने व्यक्त केला आहे.

सट्टा बाजाराने महाराष्ट्रातील अनेक जागांच्या निकालाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये अमरावती लोकसभा मतदार संघाचाही समावेश आहे. यानुसार अमरावतीची जागा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे जिंकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा नवनीत राणा आणि भाजपला मोठा फटका आहे. कारण नवनीत राणा यांनी यावेळची निवडणूक ही भाजपच्या तिकिटावर लढली होती. तरीही त्यांना अमरावती जिंकता आली नाही.

खरं तर नवनीत राणा यांच्या पराभवाची अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे महायुतीतील बच्चू कडू यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला असलेला विरोध आहे. आणि दुसरं म्हणजे याच जागेवर कडूंनी त्यांचा उमेदवार दिनेश बूब यांना निवडणूकीच्या उतरवले होते. यामुळे मतात फुट होण्याची मोठी शक्यता होती.

अमरावती मतदार संघातील पक्षीय बलाबल पाहिल्यास बडनेराचे एकमेन आमदार रवी राणा यांचा नवनीत राणा यांना पाठिंबा आहे. या मतदार संघात 55.78 टक्के मतदान झाले आहे.तर अमरावतीतून काँग्रेस आमदार सुलभा खोडेक यांच्या मतदार संघात 57.52 टक्के, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदार संघात 64.16 टक्के आणि काँग्रेस आमदार बलवंत वानखडे यांच्या दर्यापूर मतदार संघात 66.88 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे या तीन मतदार संघातून बळवंत वानखेडे यांच्या पारड्यात मोठी मतं पडली आहेत. त्यामुळे त्यांचा विजय पक्का मानला जात आहे.