देश

तिहार तुरुंग प्रशासन अमानवी वागणूक देत असल्याचा आरोप

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंग प्रशासन अमानवी वागणूक देत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला. त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत सुनीता केजरीवाल यांना तिहार तुरुंगात अरविंद केजरीवाल यांच्याशी समोरासमोर भेटण्याची परवानगी नसल्याचे सांगितले. अधिका-यांनी त्यांना खिडकीतून केजरीवाल यांना भेटू दिलें. तिहार जेल प्रशासन भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तिहार तुरुंगात आमने-सामने भेटणं सामान्य बाब आहे. अरविंद केजरीवाल यांना अमानुष वागणूक दिली जात आहे. भ्याड गुन्हेगारांनाही त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी आहे. तर दिल्लीचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केजरीवाल यांच्या पत्नीला आणि पीएला खिडकीतून भेटायला लावले जात आहे असे अमानुष वर्तन का? असा सवाल संजय सिंह यांनी केला. हे कृत्य केवळ मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अपमानित करण्यासाठी आणि निराश करण्यासाठी केले जात आहे. आजचा लढा लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा असल्याचेही ते म्हणाले.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे खासदार अरविंद केजरीवाल यांची भेट तिहार तुरुंग प्रशासनाने शेवटच्या क्षणी रद्द केल्याचा आरोप आप नेत्याने केला. यामागे सुरक्षेचे कारण सांगण्यात आले. आम्हाला सांगण्यात आले आहे की पंजाबचे मुख्यमंत्री आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खिडकीच्या चौकटीतून भेटावे लागेल. तुम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री, पंजाबचे मुख्यमंत्री यांचा अपमान करत आहात, अरविंद केजरीवाल यांना तोडण्याचा प्रयत्न करत आहात. माझी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक रद्द करण्यात आली आहे असेही ते म्हणाले.