ताज्या बातम्या विदर्भ

राज्यातील जलसाठा ५३ टक्केच…!

ठाणे व कोकण विभागात एक गाव व तीन वाड्यांत दोन टँकरनी पाणीपुरवठा
मुंबई : उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच राज्यातील लघु, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये केवळ ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा २६ टक्क्यांनी कमी आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर वगळता राज्याच्या इतर विभागातील ५४५ गावांत व १ हजार १६२ वाड्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
राज्यातील २ हजार ९९४ प्रकल्पांची एकूण ४० हजार ४८५ दशलक्ष घनमीटर जलसाठा क्षमता आहे. यात सध्या २१ हजार ६५७ दशलक्ष घनमीटर साठा उरला आहे. २०२३ मध्ये हा पाणीसाठा याच कालावधीत ७९.४३ टक्के होता. विदर्भातील धरणांच्या जलसाठ्याची स्थिती बघता अमरावती विभागात ६४ तर नागपूर विभागात ६१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नागपूर विभागातील ३८३ प्रकल्पांची एकूण ४ हजार ६०६ दशलक्ष घनमीटर जलसाठा क्षमता आहे. त्यात २ हजार ८११ दशलक्ष घनमीटरवर जलसाठा उरला आहे.
अमरावती विभागातील २६१ प्रकल्पांची एकूण ३ हजार ७७४ दशलक्ष घनमीटर क्षमता असून २ हजार ४०३ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. या भागातील बुलडाणा जिल्ह्यातील तीन गावांत टँकर लागले आहेत. आगामी काळातील पाण्याची मागणी, बाष्पीभवनाचा वेग बघता धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पाणी नियोजनाची गरज व्यक्त होऊ लागली आहे. २०१६ मध्ये राज्यात तीव्र पाणीटंचाई भासली होती हे विशेष.
नाशिक विभागात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. या विभागात २२८ गावे आणि ३१९ वाड्यांमध्ये १५२ टँकरनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात १६३ गावे आणि ४२ वाड्यांमध्ये २२६ टँकरनी, पुणे विभागात १५० गावे आणि ७९८ वाड्यांमध्ये १५४ टँकरनी, अमरावती विभागातील तीन गावांत तीन टँकरनी तर ठाणे व कोकण विभागात एक गाव व तीन वाड्यांत दोन टँकरनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.