देश

गडचिरोली हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेचाही मृत्यू; आतापर्यंत तिघांचे बळी

गडचिरोली – भामरागड तालुक्यातील हिदूर येथे रानटी हत्तीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तीन महिलांपैकी दुसऱ्या महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. २५ एप्रिल रोजी कियर येथील गोंगलू रामा तेलामी या शेतकऱ्यास दुपारी ठार केल्यानंतर रानटी हत्तीने रात्री हिदूर गावात धुडगूस घालून तीन महिलांना गंभीर जखमी केले. त्यापैकी राजे कोपा हलामी (५५) हिचा २६ एप्रिल रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. २८ एप्रिल रोजी महारी देवू वड्डे (४७) हिचा मृत्यू झाला.

तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांना ठार करून रानटी हत्तीने भामरागड तालुक्यात प्रवेश केला होता. २५ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास या तालुक्यातील कियर येथील शेतशिवारात काम करीत असलेल्या गोंगलू तेलामी या शेतकऱ्याला पायाखाली चिरडून ठार केले. त्यानंतर हा हत्ती त्या भागातून पसार होऊन आरेवाडावरून दोन किलोमिटरवरील हिदूर गावात दाखल झाला.

याठिकाणी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सुरू असलेल्या माता पूजनाच्या कार्यक्रमात त्याने धुडगूस घालून महारी वड्डे, राजे आलामी व वजे पुंगाटी यांना गंभीर जखमी केले. २५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास तिन्ही महिलांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले.

२६ एप्रिल रोजी उपचारादरम्यान राजे कोपा हलामी (५०) हिचा रुग्णालयात मृत्यू झाला होता, तर २८ एप्रिल रोजी महारी वड्डे हिने देखील अखेरचा श्वास घेतला. वंजे जुरू पुंगाटी (४७) या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिदूर व कियर येथे रानटी हत्तीने धुडगूस घातल्यानंतर आपला मोर्चा बिनागुंडा या छत्तीसगड सीमेवरील गावाकडे वळवला. तेथील दामनमरका या छोट्या गावात हत्तीने धुमाकूळ घातला. हत्तीने तेथील पाच ते सहा घरांचे नुकसान केले. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.