देश

ईडी आणि अन्य केंद्रीय यंत्रणांचे काम योग्यच

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आता काही दिवसांवरच आले आहे. आणि या दरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मुलाखत समोर आली आहे. एका खासगी वृत्तसंस्थेने ही मुलाखत घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणूक आणि पुढील योजना याबाबत त्यांनी या मुलाखतीत मनमोकळेपणाने बातचीत केली आहे.

ईडी आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणा अगदी योग्यपणे काम करत असल्याचे मोदी म्हणाले. राजकीय विरोधकांना या यंत्रणांच्या कचाट्यात अडकवल्याच्या विरोधकांच्या आरोपावरही पंतप्रधान मोदींनी आपले मत व्यक्त केले. मोदी म्हणाले, तपास यंत्रणांनी ज्यांच्यावर कारवाई केली आहे, त्यातील केवळ 3 टक्के राजकीय व्यक्ती आहेत. तर ज्यांच्यावर कारवाई होते आहे, अशा उर्वरित 97 टक्के लोक हे राजकारणाशी संबंधित नाहीत. दरम्यान, नेहमीप्रमाणे ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर मोदी यांनी टीका केली आहे. आपल्या पराभवाचे खापर फोडण्यासाठी विरोधक काही न काही बहाणा नेहमीच शोधात असतात, आणि त्यासाठीच ते नेहमी ईव्हीएमवर टीका करत असतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

केंद्र सरकार घेत असलेल्या कोणत्याही निर्णयामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. कारण, आम्ही कोणालाही घाबरवण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी कोणताही निर्णय घेत नाही तर हे सगळे निर्णय देशहितासाठी घेतले जातात. मात्र, याबाबत विरोधी पक्षाकडून होत असलेल्या आरोपांबाबत विचारले असता, ते म्हणाले की, त्यांना निर्णयांची नाही तर हरण्याची भीती वाटते. आणि त्यासाठी ते स्वतःला दोष देत नाहीत. त्यामुळे मग ईव्हीएम आणि तपास यंत्रणांना दोष दिला जातो.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामकाजाबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ज्या कायद्यांअंतर्गत केंद्रीय यंत्रणा कारवाई करत आहेत, त्यातला कोणताही कायदा आमच्या सरकारने केलेला नाही. निवडणूक आयोग सुधारणा कायदा आमच्या सरकारने आणला आहे. यापूर्वी तर एकाच परिवाराच्या जवळच्या लोकांना निवडणूक आयुक्त बनवण्यात येत होते, त्यानंतर ते राज्यसभेतही जात असत, त्यांना मंत्री देखील बनवले जात होते. आम्ही या पद्धतीने काम करत नाहीमी असंही त्यांनी सांगितलं.

एक देश, एक निवडणूक यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या समितीकडे लोकांनी आपल्या सूचना दिल्या आहेत, आणि त्या सकारात्मक आहेत. एक देश, एक निवडणूक लागू केल्याने देशाला फायदाच होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्यावर टीका करताना, आपण देत असलेल्या शब्दाबाबत काहीच बांधिलकी नसलेले अनेक राजकीय नेते अलीकडे दिसत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ज्यांच्याकडे जवळपास पाच ते सहा दशके देशाची सत्ता होती, ते सांगतात की एका झटक्यात गरिबी संपवून टाकू. जेव्हा राजकीय नेते असं बोलतात, तेव्हा जनता देखील विचार करते. 50 – 60 वर्षे हातात मिळूनही अशाप्रकारे जेव्हा बोललं जातं, तेव्हा जनता देखील विचार करते.

परकीय गुंतवणूक तसेच एलॉन मस्क यांच्या भारत दौऱ्याबाबत विचारले असता, पंतप्रधान म्हणाले की, भारतात परदेशी गुंतवणूक यावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र गुंतवणूक आली तरी रोजगार स्थानिकांनाच मिळाला पाहिजे. त्यांचा पैसा आणि आपला घाम असं असायला हवं. आपल्या देशवासीयांना रोजगार मिळायला हवा. त्या उत्पादनांमधून आपल्या देशातील मातीचा सुगंध यायला हवा, असंही ते म्हणाले.