ताज्या बातम्या

‘राहुल गांधी सोबत माझे लग्न…’, अदिती सिंह यांनी उघडले राज

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या लग्नाची चर्चा अधूनमधून सुरुच असते. माध्यमांनी राहुल गांधी यांना यासंदर्भात प्रश्न विचारले होते. परंतु त्यांनी थेट उत्तर देणे टाळले होते. उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या आमदार अदिती सिंह यांचे राहुल गांधी यांच्यासोबत लग्न होणार असल्याची चर्चा काही काळापूर्वी रंगल्या होत्या. त्या चर्चेवर काँग्रेसमधून भाजपत आलेल्या अदिती सिंह यांनी पत्रकार बरखा दत्त यांना दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिले आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत लग्नाच्या चर्चेवर आपले मत मांडले.

उत्तर प्रदेशातील भाजप आमदार अदिती सिंह सध्या लोकसभा निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. त्या 2021मध्ये काँग्रेसमधून भाजपत आल्या होत्या. त्यांनी नुकतीच पत्रकार बरखा दत्त यांना मुलाखत दिली. त्या मुलाखतीत फक्त राहुल गांधीच नाही तर प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रा यांच्यासंदर्भात त्यांनी मत मांडले. काँग्रेसमध्ये असताना 2017 मध्ये त्या निवडणुकीच्या रणात उतरल्या होत्या. त्यावेळी प्रथमच त्या राहुल गांधी यांना भेटल्या होत्या. त्यामुळे त्या राहुल गांधी सोबत लग्न करणार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. परंतु अदिती सिंह यांनी ही चर्चा फेटाळून लावली होती. आता पुन्हा त्यांनी त्यावर आपले मत मांडले आहे. त्या चर्चेनंतर राजकारण सोडून देण्याचा विचार आपण केले होते, असे त्यांनी सांगितले.

आता बरखा दत्त यांना दिलेल्या मुलाखतीत अदिती सिंह म्हणाल्या, माध्यमे माझे राहुल गांधींसोबत लग्न लावत होते. त्या अफवांमुळे मला खूप त्रास झाला. मी राजकारणातून बाहेर पडण्याचा विचार केला होता. एक महिला असल्याची किंमत मला चुकवावी लागली.

अदिती सिंह म्हणाल्या, सन ‘2017 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर राहुल गांधी यांनी मला प्रश्न विचारला. उत्तर प्रदेशात काँग्रेसचे किती आमदार आहेत. त्यानंतर मला वाटले कोणत्या पक्षात मी आली आहे. राजकारणात महिलांच्या भूमिकेवर अदिती सिंह म्हणाल्या, महिलांसाठी राजकारण एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.