harabhara-akola
अकोला

हरभरा खरेदीची ऑनलाईनसह ऑफलाईनही नोंदणी होणार

नाफेडकडून हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरू झाली. मात्र सकाळी शेतकर्‍यांची झुंबड उडाल्याने खरेदी नोंदणी बंद करण्यात आली. त्यानंतर शेतकरी आक्रमक झाले.आता हरभरा खरेदीची ऑनलाईनसह ऑफलाईनही नोंदणी होणार आहे. नाफेडच्या अमरावतीतील केंद्रांवर झालेल्या गोंधळानंतर घोषणा करण्यात आली आहे.

हरभरा विकण्यासाठी धामणगाव रेल्वे शहरात शेतकर्‍यांनी कालपासून (२६ फेब्रुवारी) रांगा लावल्या होत्या. आज (२७ फेब्रुवारी) सकाळी नोंदणीसाठी कार्यालयाचं दार उघडताच शेतकर्‍यांची एकच झुंबड या ठिकाणी उडाली. सकाळी आठ वाजता एका शेतकरी गेटच्या आत जाणं अपेक्षित होतं. मात्र प्रवेश सुरु होताच एकच गोंधळ उडाला तब्बल एक हजार शेतकरी गेटच्या आत गेल्याने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे अखेर हरभरा नोंदणी बंद करावी लागली. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकर्‍यांची व्यथा दाखवल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि पणन सचिव यांच्यात बैठक झाली.

या बैठकीनंतर शेतकर्‍यांच्या चना खरेदीची नोंदणी ऑफलाईन होणार आहे. शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील नाफेडच्या केंद्रावर चणा खरेदीची नोंदणी प्रक्रिया सुरु होणार होती. मात्र, शेतकर्‍यांची प्रचंड गर्दी झाल्याने ही प्रक्रिया बंद करण्यात आली. या केंद्रावर शेतकर्‍यांनी रविवारी दुपार पासूनच रांग लावायला सुरुवात केली होती. प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी किमान दोन ते अडीच हजार शेतकरी उपस्थित होते. अपुरी व्यवस्था आणी पोलीस बंदोबस्त नसल्याने शेतकर्‍यांनी एकच गर्दी केली आणि गोंधळ उडाला.

मागील वर्षी देखील शासनाने ४ हजार शेतकर्‍यांची नोंदणी करुन प्रत्यक्षात मात्र अडीच हजार शेतकर्‍यांचा माल खरेदी केला. त्यामुळे उर्वरित शेतकर्‍यांना आपला माल खुल्या बाजारात कवडीमोल दराने विकावा लागला. यावर्षी देखील अशीच परिस्थिती होऊ नये त्यासाठी आपला नंबर खरेदीसाठी लागावा या उद्देशाने शेतकर्‍यांनी खरेदी केंद्रावर गर्दी केली.

हरभर्‍याचा हमीभाव ५३०० असल्याने शेतकर्‍यांनी कालपासूनच नोंदणी करण्यासाठी रांगा लावल्या. सध्या शेतकर्‍यांकडे हरभरा घरात पडून आहे बाजारात ४२०० ते ४४०० रुपये दर मिळत असल्याने सगळ्या शेतकर्‍यांचा कल नाफेडकडे आहे. कारण नाफेडचे हमीभाव हे ५३०० रुपये असल्याने प्रत्येक शेतकरी आपला हरभरा याठिकाणीच विकण्यासाठी येत आहे. आज झालेल्या या संपूर्ण गोंधळात खरेदी विक्री संघाचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे दिसून आले.

शेतकर्‍यांची गर्दी कालपासून होत असताना कुठलीच ठोस व्यवस्था याठिकाणी दिसून आली नाही. एकच गर्दी झाल्याने शेतकर्‍यांना चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याचे प्रकार सुद्धा समोर आले. रात्रीपासून आलेले शेतकरी थंडीत रस्त्यावर झोपल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. काही शेतकरी तर खरेदी केंद्रावरच झोप घेत असल्याचे दिसून आले.