अकोला

पातूर तालुक्यात मुसळधार पावसासह गारपीट, फळबागा व पिकांचे अतोनात नुकसान

पातूर : शहरासह तालुकाभरात गारपिटीने चांगलेच झोडपले असून, पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यां‍च्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेला आहे.

पातूर तालुक्यात दि. 17/03/2023 रोजी दुपारी 4 : 00 वाजताच्या दरम्यान वातावरणात अचानक बदल झाल्याने वादळी वाऱ्यासह गारपिटीला सुरुवात झाली.पातूर शहरासह तालुक्यातील चिंचखेड, बोडखा, देऊळगाव, खानापूर, विवरा, आलेगाव, चान्नी, मळसुर येथे गारपिटीमुळे काही प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्यातील आस्टूल, कोठारी बु. , पास्टूल कोठारी खु. येथे जोरदार गारपीट झाल्याने आंब्याला आलेला बहर पूर्णपणे झडून आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संत्रा,लिंबूच्या, टरबूज, खरबूज, पपई, फळबागांचे देखील नुकसान झाले.त्याचबरोबर गहू व कांदा, भाजीपाला पिकांचे देखील नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून कोठारी खु. येथील गोपाल टप्पे,हिम्मत टप्पे,शेषकुमार टप्पे,लक्ष्मण टप्पे, भीमराव टप्पे,भाऊराव ठाकरे,रवी सोयस्कार, पाडूरंग कावळे आदी शेतकऱ्यांचे संत्रा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त होताच पातूरचे तहसीलदार दीपक बाजड, मंडळ अधिकारी सबनीस, तलाठी नासिर पठाण, किशोर खुरसडे, नाईक, जमोदकर, तिवारी,मुजाहिद यांनी तालुक्यातील ग्राम आस्टूल,पास्टूल व कोठारी बु. येथे जाऊन प्राथमिक पाहणी केली.

आज दि.17 मार्च 23 रोजी झालेल्या गारपिटीने आस्टूल,पास्टूल व कोठारी बु. येथे पिकांचे नुकसान झाल्याच्या माहितीवरून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.प्राथमिक पाहणी करून तलाठ्यांना सदर पीकनुकसानीचा सर्व्हे अवहाल तयार करण्याचे आदेश दिले,तसेच सदर नुकसणीबाबतची माहिती वरिष्ठांना त्वरित कळवितो.
– दीपक बाजड (तहसीलदार,पातूर)