Sharad Pawar statement on ECI Decision
राजकीय

धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतल्याचा फारसा परिणाम होणार नाही – शरद पवार

पुणे, 18 फेब्रुवारी : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतल्याचा फारसा परिणाम होणार नाही, नवीन चिन्ह घेऊन त्यांना लोकांसमोर जावे लागेल आणि लोकही त्यांचं नवीन चिन्ह मान्य करतील, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

बारामतीत आज आल्यानंतर माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना असे सांगितले की, यापूर्वी काँग्रेसला देखील गाय वासरू हे चिन्ह गमवावे लागले होते.

हे चिन्ह गेल्यानंतर त्यांनी हाताचा पंजा हे चिन्ह स्वीकारले आणि नंतरच्या काळात लोकांनी ते चिन्ह मान्य केले.या निर्णयाचा उद्धव ठाकरे यांच्यावर फारसा परिणाम होईल असे वाटत नाही, असे मत व्यक्त करून शरद पवार म्हणाले की, या निर्णयाची काही दिवस चर्चा होईल आणि नंतर लोक विसरून जातील आणि नवीन चिन्ह मान्य करतील.दरम्यान निवडणूक आयोगाने हा निर्णय दिलेला असल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही असेही शरद पवार यांना नमूद केले.