Neelam-Gorhe
राजकीय

दहिसरमधील भाजप कार्यकर्यावरील हल्ल्याचे परिषदेत पडसाद

सूत्रधाराला उद्यापर्यंत अटक करा! – उपसभापती नीलम गो-हे यांचे निर्देश

मुंबई, दि. 20  : दहिसरमधील एका लोकप्रतिनिधीच्या तीन घटना समोर आल्या आहेत. एक डीएनएची, दुसरी घटना चित्रफितीची आणि आता सीसीटीव्हीतून हल्ल्याची तिसरी घटना समोर आली आहे. दहिसरमध्ये भाजप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करण्यामागे कोणी ना कोणी सूत्रधार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे या हल्लामागे असलेल्या टोळक्याच्या सूत्रधाराला उद्यापर्यंत अटक करा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले. दरम्यान, हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी प्रयत्न करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात येईल. कोणाच्या दबावाखाली गुन्हा दाखल करण्यात तसेच रुग्णालयात भरती करण्यात मनाई करण्यात आली, याचीही चौकशी केली जाईल, असे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्यावतीने सांगितले.

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषदेत माहितीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी ते म्हणाले, एका विधानसभा सदस्याच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या बिभीषण वारे नावाच्या कार्यकर्त्याला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. तलवारीने वार केले. यात अनेक गुन्हे दाखल असलेला आशीष नायर हा मोठा गुन्हेगार आहे.

मारहाणीत आमदाराच्या मुलाचा चालकही सामील आहे. प्राणघातक हल्ल्यानंतर जखमी झालेल्या वारे यांना पालिकेच्या रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. त्याचबरोबर पोलिसांनीही गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण होत असेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे संबंधिताला मोक्का लावावा. सरकारने याबाबतीत खुलासा करून निवेदन करावे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

बेलगामांना चाप बसला पाहिजे!

अनिल परब यांनीही कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, एक आमदार खुलेआम रिव्हॉल्हरमधून गोळी झाडतो तर दहिसरमध्ये कार्यकर्त्यांना चिथावणी देताना आड येणाऱ्यांचे हातपाय तोडा, तुम्हाला टेबल जामीन मिळवून देतो, असे म्हणतो. अशी विधाने करणार्या आमदाराला वेळीच योग्य शिक्षा झाली असती तर आज अशी हिंमत झाली नसती. भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून कार्यकर्यावर हा हल्ला करण्यात आला. ज्यांना सरकार आपल्या खिशात आहे, असे वाटते, अशा बेलगामांना चाप बसला पाहिजे. म्हणून गृहमंत्र्यांनी तात्काळ निवेदन करावे, अशी मागणी अनिल परब यांनी केली.

सूडभावनेने केलेला हल्ला !

भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनीही राजकीय सूडभावनेने हा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्याची आवश्यकता आहे. पोलीस निरीक्षक आणि उपअधीक्षकाला त्याचप्रमाणे रुग्णालयात दाखल करून न घेणाऱ्या शताब्दी रुग्णालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यालाही निलंबित करा तसेच हल्लेखोरांना तात्काळ अटक करून संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांना मोक्का लावा, अशी मागणी केली.