अकोला: अकोला तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी डॉ. अमोल पळसपगार यांनी अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा असे आवाहन केल्यानंतर तालुक्यातील १७५ नागरिकांनी तसे अर्ज भरून दिले आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू.काळे,तहसीलदार सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पुरवठा अधिकारी डॉ. पळसपगार ही मोहीम राबवित आहेत. बुधवार दि.२२ फेब्रुवारी रोजी तहसील सभागृहात स्वस्त धान्य दुकानदारांची सभा घेतली.
या सभेत डॉ. पळसपगार यांनी आवाहन करताच रास्त भाव संघटनेचे तालुका अध्यक्ष शंकरराव झटाले यांच्या नेतृत्वात अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडत असल्याचे अर्ज दाखल केले असल्याची माहिती मिळाली आहे.
त्यामुळे आता १७५ नागरिकांनी अन्नधान्याच्या अनुदानातून माघार घेतली आहे. सदर धान्य इतर गरीब नागरिकांच्या कामात येईल असे पुरवठा अधिकारी डॉ अमोल पळसपगार यांनी सांगितले. अजूनही श्रीमंत नागरिकांनी या योजनेतून बाहेर पडावे असे आवाहन तालुका पुरवठा अधिकार्यांनी केले आहे.