ताज्या बातम्या महाराष्ट्र

आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष निनादणार !

मुंबई, प्रतिनिधी : आग्रा किल्ल्याचा ‘ दिवाण – ए – आम ‘ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे.

कित्येक दशकानंतर महाराष्ट्र सरकार आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे हा योग जुळून आला आहे. केंद्र सरकारने आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यात परवानगी दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राचे आभार मानले आहेत.

मराठेशाहीच्या इतिहासात आग्रा येथील किल्ल्याला मोठे महत्व आहे. शिवछत्रपतींनी याच किल्ल्यातील ‘दिवाण-ए- आम’ मध्ये औरंगजेबासमोर बाणेदारपणाचे दर्शन घडवले होते.

यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने ‘दिवाण-ए- आम’ निनादणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. आग्रा किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्याची मागणी काही सामाजिक संस्थांनी केंद्र सरकारकडे केली होती.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यास नकार दिला होता. त्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. या कार्यक्रमाचे महाराष्ट्र सरकार सहआयोजक असेल, तर आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्व सर्वेक्षण विभागाला तातडीने पत्र पाठविले. त्यात महाराष्ट्र सरकार व काही सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करणार असल्यास तयार असल्याचे कळविले होते. त्यानुसार पुरातत्व विभागाने महाराष्ट्र शासनाला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये उत्साह पसरला आहे.