अकोला क्रीडा

आकोटच्या दिव्यांग गिर्यारोहक धीरजची श्रीनगर ते कन्याकुमारी सायकल वारा

३६५१ कि.मी.च्या सायकलिंग स्पर्धेत सहभाग

अकोट : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवाशी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक धीरज बंडू कळसाईत हा काश्मिर ते कन्याकुमारी सायकलींग करीत १ मार्च रोजी श्रीनगर येथून निघाला आहे. एक हात व पाय नसतांनाही आत्मविश्वास, जिद्द व चिकाटीच्या भरवशावर दिव्यांगत्वावर मात करत २५ वर्षीय धीरज श्रीनगरच्या लाल चौकातून प्रारंभ झालेल्या रेस अक्रॉस इंडिया या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

काश्मिर ते कन्याकुमारी हे ३६५१ कि.मी.चे अंतर अवघ्या काही दिवसात कापून गिनीज बुकात त्याच्या विक्रमाची नोंद व्हावी अशी अपेक्षा आहे. त्याच्या या मोहीमेत अनेकांनी मदतीचा हात देत धीरजचे मनोबल वाढविले असून दिव्यांग क्षेत्रात सायकलींग करणारा सोलो स्पर्धेतील धीरज हा कदाचित पहिला भारतीय ठरणार आहे. अकोट येथील धीरज कळसाईत याने या मोहीमेत सहभागी होण्यापूर्वी दररोज ३०० कि.मी. सायकलींगचा सराव केलाआहे.

Dhiraj-Bandu1

श्रीनगर मधुन निघालेल्या या सायकलींग स्पर्धेत धीरज भारतातील जवळपास ११ राज्य व २५ महत्वपूर्ण शहरातून जाणार आहे. एका हाताची बोटं व एक पाय नसतांना सायकलींग करीत सुसाट्याचा वारा, खडतर मार्ग व धाडसी प्रवास करीत आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन नेत्रदपक कामगिरीकरिता निघाला आहे. दररोज रात्रंदिवस सायकलींग करित असतांना धीरजवर थेट सॅटेलाईट तसेच इतर यंत्रणेव्दारा लक्ष ठेवल्या जाणार आहे.

धीरजच्या या मोहीमेत लोकजागर सह विविध शहरातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देत दिव्यांगाचे स्वप्न पूर्ततेकरिता सहकार्य केले आहे. या मोहीमेत संपूर्ण भारतातून जलदगतीने सायकलींग करणारे विविध क्षेत्रातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. मात्र एक हात आणि पाय नसलेला महाराष्ट्रातील धीरज कळसाईत हा एकमेव स्पर्धक आहे.

धीरज कळसाईत च्या कुटूंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असून आई, वडील, भाऊ, बहिण हे मजूरी करुन उदरनिर्वाह चालवितात. धीरज ने आर्थिक संकटाला तोंड देत बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण केले आहे. धीरज ला जन्मापासून डावा हात मनगटापासून नाही तर अपघातात त्याचा एक पाय निकामी झाला आहे. असे असले तरी धीरजने यापूर्वी सुध्दा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाईसह इतर शिखर, गडकिल्ले सर केले आहेत.

आंतरराष्ट्रीय गिर्यरोहक म्हणून धीरजने रशिया मधिल हिम शिखर माऊंट एल्ब्रुज व दक्षिण ऑप्रâीकेतील माऊंट किलीमंजारो हे हिमशिखर सर करुन भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकविला आहे. राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम दर्शविणार्‍या धीरजच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे.

या सायकल स्पर्धेत धीरज सोबत या स्पर्धेत सहाय्यतेकरिता टिम लिडर म्हणून राजीक अली याचेसह अर्चना गडधे, विशाल सुभेदार व प्रफुल्ल गिरी सोबत आहेत. श्रीनगर ते कन्याकुमारी हे अंतर ३६५१ कि.मी.चे अंतर १० दिवसात पूर्ण करण्याचा संकल्प केल्याचे धीरज कळसाईत याने सांगितले.