summer-in-akola
अकोला

अंगाची लाहीलाही होणार! पुढील पाच दिवसात उकाडा वाढणार, हवामान विभागाचा इशारा

अकोला: यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा तडाखा बसत आहे. नागरिकांनो, तयारीत राहा. येत्या काही दिवसांमध्ये उन्हाचा तडाका आणखी वाढणार आहे.भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांमध्ये तापमानाचा पारा वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांमध्येही तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे.दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेनं विक्रम मोडण्यास सुरुवात केली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्या आधीच तापमानात वाढ झाली आहे.भारतीय हवामान विभागाकडून गुरुवारी (२३ फेब्रुवारी) मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरपश्चिम भारत, मध्य भारत आणि पूर्व भारतात पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात सामान्यपेक्षा तीन ते पाच अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार, भारतात पुढील पाच दिवसात तापमान वाढणार आहे.

२४ फेब्रुवारी राजधानीत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.अजून मार्च महिना सुरूही झाला नसला तरी तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. आता आगामी पाच दिवस वातावरणातील उष्णता आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हवामान विभागाने सांगितलं की, मार्चच्या महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत वायव्य भारतातील काही ठिकाणी तापमानाचा पारा हा ४० अंश सेल्सिअस आणि त्याहून अधिक वाढू शकतो.

जिल्ह्यात ३ दिवसांपासून तापमान ३८ अंशांच्या पुढे

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा कडाका जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कमाल तापमान ३८ अंश सेल्सियसच्या पुढे राहत आहे. यंदा वर्षाच्या सुरुवातीपासूनच वातावरणात वारंवार कमालीचा बदल होताना दिसला.ढगाळ वातावरण, मध्येच थंडी, पाऊस आणि दुपारचा उकाडा अशी स्थिती सुमारे दोन महिने जिल्ह्यात अनुभवायला आली.

अशात आता गेल्या तीन दिवसांपासून शहरात उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारी बाजार परिसर आणि मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.तर दुसरीकडे रसवंत्या, शीतपेये विक्रेते आणि आईस्क्रिम पार्लरवर सायंकाळनंतर अकोलेकरांची वर्दळ वाढत आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्या माहितीनुसार वातावरण कोरडे राहणार असून किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.जिल्ह्यात तीन दिवसांपासून किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सियस राहत आहे. त्यामुळे मध्य रात्रीपासून पहाटेपर्यंत हलकीशी थंडी जाणवत आहे. तर तिन्ही दिवस किमान तापमान ३८ अंशांच्या पुढे राहिले आहे.