देश

सीमा सुरक्षा बलाच्या अधिकार क्षेत्रात बदलांबाबत आजी माजी एकमेकांच्या विरोधात!

चंदीगड, १४ऑक्टोबर : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार  सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारक्षेत्रात काही राज्यात वाढ तर काही राज्यात सीमा सुरक्षा दलाची कारवाई करण्याची हद्द कमी करण्यात आली.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचे पंजाबचे माजी मुख्यमंत्री यांनी समर्थन केलं तर नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी, केंद्र सरकारच्या या निर्णयावरून नाराजी व्यक्त केली आहे.

एकंदरीत गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे आजी माजी मुख्यमंत्री एकमेकांच्या विरोधात उभे झाल्याचं चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नूतन मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी केंद्राच्या या निर्णयाबद्दल परस्परविरोधी वक्तव्यं केली आहेत.

प्रमुख मुद्दे

  • केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सीमा सुरक्षा अधिकारक्षेत्रात  बदल
  • पश्चिम बंगाल, पंजाब आणि आसाममध्ये बीएसएफच्या अधिकारक्षेत्रात वाढ करण्यात आली
  • तर गुजरातसह काही राज्यांत बीएसएफचं अधिकारक्षेत्राची सीमा घटविण्यात आली

तीन राज्यांत बीएसएफच्या अधिकारक्षेत्रात वाढबीएसएफच्या अधिकाऱ्यांना पश्चिम बंगाल, पंजाब आणि आसाममध्ये देशाच्या सीमेपासून ५० किमी पर्यंतच्या भागात तपास, अटक आणि जप्तीची परवानगी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.

याअगोदर बीएसएफला केवळ १५ किलोमीटरपर्यंत कारवाईचे अधिकार होते.सोबतच, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, नागालँड आणि त्रिपुरा याराज्यांत बीएसएफचं अधिकारक्षेत्र घटवण्यात आलंय. या राज्यांतील बीएसएफचं अधिकार क्षेत्र अगोदर ८० किलोमीटरपर्यंत होतं ते आता २० किलोमीटर पर्यंत घटवण्यात आलंय.

गुजरातमध्येही बीएसएफचं अधिकारक्षेत्र ८० किलोमीटरवरून ५० किलोमीटरपर्यंत करण्यात आलंय. राजस्थानमध्ये (बीएसएफ अधिकार क्षेत्र ५० किलोमीटर) मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

पाकिस्तान सीमेवर बीएसएफच्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्राची ५० किमी पर्यंत वाढ करण्यात आल्यानंतर संबंधित राज्यांकडून केंद्रावर अधिकारहननाचा आरोप केला जात आहे. याच विषयावर बोलताना मुख्यमंत्री चन्नी यांनी केंद्राच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय तर दुसरीकडे अमरिंदर सिंह यांनी यांनी केंद्राच्या या निर्णयाचं स्वागत केलं.