Ramdas-Athawale रामदास आठवले
मुंबई

मालाड झोपडपट्टी आग प्रकरणी : मृत १३ वर्षीय मुलाचा कुटुंबीयांना 10 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य आणि झोपडीधारकांचे पुनर्वसन करावे !

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई दि.17– मालाड पूर्वेतील जामऋषी नगर झोपडपट्टीला सिलेंडर स्फोटाने लागलेल्या भीषण आगीत ७० झोपड्या खाक झाल्या आहेत. त्यात एका १३ वर्षीय निरागस मुलाला जीव गमवावा लागला आहे.

या दुर्घटनस्थळाला आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री.रामदास आठवले यांनी भेट देऊन मयत मुलाच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. या मयत मुलाच्या परिवाराला मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून राज्य सरकार ने 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

त्या कुटुंबाला रिपब्लिकन पक्षातर्फे 1लाख रुपयांची मदत करण्यात येईल असे आश्वासन आठवले यांनी दिले. तसेच जिल्हाअधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या नियमनुसार तातडीने खावटी ची मदत रक्कम प्रत्येक दुर्घटनाग्रस्त झोपडीधारकांस त्वरित देण्याचे निर्देश रामदास आठवले यांनी दिले.

जामऋषी नगर यातील झोपडपट्टीचा काही भाग वन जमिनीत येत आहे. जाम नगर च्या ७० झोपड्या आगीत भस्मसात झाल्या आहेत. या सर्व गरीब कष्टकरी, नाका कामगार, दलित मागासवर्गीय झोपडीवासीयांच्या जळून खाक झालेल्या झोपड्यांचे पक्के घर देऊन कायमस्वरूपी पुनर्वसन करावे.

वन जमिनीवरील झोपड्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी राज्य सरकारने कायमचा तोडगा काढला पाहिजे. त्यासाठी वनविभागाला पर्यायी जमीन देऊन वनजमिनीवरील झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी एस आर ए योजना राज्य सरकार राबवावी अशी मागणी आठवले यांनी केली.

यावेळी रिपाइंचे पोपटशेठ घनवट; जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड; प्रकाश जाधव; झोपडपट्टी आघाडी चे अध्यक्ष सुमित वजाळे; हरिहर यादव; चंद्रकांत पाटील; रमेश गौड; विजय कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.