Ramdas-Athawale रामदास आठवले
राजकीय

महिलांना एक तृतीयांश राजकीय आरक्षण देण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी

मुंबई : महात्मा फुले, सावित्रीमाई फुले आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देऊन स्त्रियांना स्वातंत्र्य समतेचा अधिकार दिला. त्यामुळे भारतीय स्त्रिया आता सर्वच क्षेत्रांत प्रगती करीत आहेत.

राजकीय सामाजिक क्षेत्रात पुढे आलेल्या महिलांचा आम्हाला अभिमान असून महिलांना विधानसभा आणि लोकसभेत एक तृतीयांश जागांचे राजकीय आरक्षण महिलांना देण्यात यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

भीम छाया सांस्कृतिक केंद्र येथे रिपाइं मुंबई प्रदेश महिला आघाडी तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून महिलांना समतेचा शिक्षणाचा हक्क दिला.त्यामुळे महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिलांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळते. मात्र महिलांना विधानसभा आणि लोकसभेच्या जागांमध्ये 33 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे असे रामदास आठवले म्हणाले. रिपाइं च्या महिला मेळाव्यास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.