vishram-baug-chembur
महाराष्ट्र

चुकीच्या / बनावट टॅक रीपोर्टच्या आधारावर चाळीतील रहिवासियांना बेघर करण्याचा मुंबई मनपाच्या एम पश्चिम विभागातील अधिकाऱ्यांचा डाव 

चेंबूरच्या विश्रामबाग चाळीचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे मुंबई मनपा आयुक्तांना पत्र 

मुंबई  :  चेंबूर पी एल लोखंडे मार्ग येथील विश्रामबाग ही सुस्थितीत असणारी आणि मजबूत घरे असणारी बैठी चाळ आहे. या चाळीतील राहिवासीयांची घरे खाली करण्याचा प्रयत्न  जागामालक करीत असून त्यासाठी मुंबई महापालिकेच्या एम पश्चिम अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या चाळीतील रहीवसीयांना घरे खाली करण्यासाठी दबाव आणला जात आहे.

चुकीचा टॅक रिपोर्ट वापरून चाळीतील घरे पाडण्यासाठी रहिवासीयांवर दबाव टाकला जात आहे. याची दखल घेऊन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी मुंबई मनपा आयुक्त ईकबाल सिंह चहल यांना पत्र पाठवून विश्रामबाग चाळीतील रहिवासियांना न्याय देण्यासाठी विश्राम बाग चाळीचे नव्याने ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे. या स्ट्रक्चरल ऑडिट मुळे सत्य समोर येईल असा दावा विश्रामबाग राहिवासीयांनी केला आहे.

विश्रामबाग चाळीतील रहिवासी आणि जागा मालक यांच्यात चाळीच्या पुनर्विकासावरून अनेक वर्षे वाद सुरू असून याबाबत चा खटला  मुंबई उच्च न्यायालयात जागा मालक हरला आहे. जागामालकाने  मुंबई मनपाच्या एम पश्चिम मधील  काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रहिवासीयांना घरे खाली करण्यासाठी दबाव टाकत आहे.

त्यासाठी इतर कुठल्या तरी जागेचा टॅक रिपोर्ट वापरून तो रिपोर्ट विश्रामबाग या चाळीचा आहे असे दाखवून सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल संबंधित जागामालक आणि मुंबई मनपाच्या एम पाश्चिम विभागातील अधिकाऱ्यांनी केली आहे.बनावट टॅक रिपोर्ट वापरून मुंबई मनपा ने सर्वोच्च न्यायालयात विश्रामबाग चाळी मध्ये तीन मजली उंच आणि 90 वर्षे जुन्या इमारती धोकादायक आहेत असा खोटा रिपोर्ट दिला. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की 90 वर्षे जुन्या आणि 3 मजली उंच धोकादायक  इमारती खाली करण्यात याव्यात.

आता या आदेशाची मुंबई मनपाला अंमलबाजवणी करायची असेल तर 90 वर्षे जुन्या आणि तीन मजली उंच इमारती विश्राम बाग चाळीच्या जागी शोधाव्या लागतील. मात्र हा रिपोर्ट खोटा असल्याने तशा इमारती विश्राम बाग चाळीत नाहीत.विश्राम बाग  ही 24 खोल्यांची बैठी चाळ आहे.

त्यामुळे बिल्डर आणि जागामालक यांच्या संगनमताने मुंबई महापालिकेच्या एम पश्चिम वॉर्ड मधील ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचा टॅक रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयात सादर केला त्यांची मुंबई मनपा आयुक्तांनी सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) यांनी केली आहे.

चेंबूर पी एल लोखंडे मार्ग येथील  विश्रामबाग  चाळ ही बैठी चाळ सुस्थितीत असुन त्याची खात्री करण्यसाठी पुन्हा नव्याने या चाळीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी मागणी करणारे पत्र रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मुंबई मनपा आयुक्त  ईकबाल सिंह चहल यांना पाठवले आहे.

जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती तोडण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशाने  विभागवार तांत्रिक सल्लागार समित्या टेक्निकल एडवायजरी कमिटी (टॅक) नियुक्त करण्यात आल्या आहेत. अशाच एका समितीच्या टॅक रिपोर्टवर अन्य  ठिकाणच्या बांधकामाचा रिपोर्ट आणि विश्रामबाग बांधकाम रिपोर्ट एकाच क्रमांकाने महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात सादर करून न्यायालयाची दिशाभूल केली आहे.

या टॅक रिपोर्ट मध्ये दाखवलेल्या 90 वर्षे जुन्या तीन मजली इमारती हरवल्या आहेत आणि संबंधित टॅक रिपोर्ट ही हरवलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात जे बांधकाम आहे त्याच्याशी विश्रामबाग चाळीचा काहीही संबंध नाही मात्र तरीही सर्वोच्च न्यायालयाची भीती दाखवून मुंबई मनपा च्या एम पश्चिम विभागाचे अधिकारी विश्रामबाग चाळीच्या राहिवासीयांवर घरे खाली करण्यासाठी दबाव टाकत आहेत.असा आरोप विश्रामबाग राहुवसीयांनी केला आहे. आम्हाला बेघर होण्यापासून वाचवा अशी कळकळीची विनंती या रहीवासीयांनी ना.रामदास आठवले यांची भेट घेऊन केली आहे.