आंतरराष्ट्रीय

दहशतवादाला नियम नसतात, तसे कारवाईलाही नसतात

पुणे : भारताच्या परराष्ट्र नीतीमध्ये विशेषतः दहशतवाद हाताळण्यासंदर्भातील धोरणांमध्ये 2014 पासून लक्षणीय बदल झाले आहेत. त्यामुळेच सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. पुण्यात तरुणांशी संवाद साधताना ते बोलत होते. ‘Why Bharat Matters’, या एस. जयशंकर यांच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन झाले, त्यावेळी त्यांनी तरुणांशी संवाद साधला.

एस. जयशंकर यांनी यावेळी 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा उल्लेख केला. काँग्रेस प्रणित संपुआ सरकार तेव्हा सत्तेवर होते. 26/11 चा हल्ला झाला तेव्हा सर्वांनाच पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायचे होते. मात्र, तेव्हाचे सरकार केवळ चर्चा करत राहिले. आणि पाकिस्तानला प्रत्युत्तर न दिल्याची किंमत आपण मोजली. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यासारखे काही घडलेच आणि जर तुम्ही त्यावर काही कारवाईच केली नाहीत, तर पुढील हल्ले कसे थांबवाल, असा सवालही त्यांनी केला.

आम्ही दुसऱ्यावर हल्ले करू आणि आमच्या देशात येऊन बसू, असा विचार जर दहशतवादी करत असतील तर तो आपण खोडून काढला पाहिजे. दहशतवादी कोणतेही नियम पाळत नाहीत त्यामुळे, त्यांच्यावरील कारवाईला देखील कोणतेही नियम लागू होत नाहीत, असे जयशंकर यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळेच 2014 पासून भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात बदल केला. 50 टक्के धोरण हे आधीचेच असले तरी उर्वरित 50 टक्क्यांमध्ये बदल झाला आहे, आणि यात दहशतवादाचा समावेश आहे.

कोणत्या देशाशी संबंध राखणे हे आव्हानात्मक आहे, असा प्रश्न जयशंकर यांना विचारला असता, असे अनेक देश आहेत पण, सगळ्यात मोठे आव्हान आहे ते पाकिस्तानचे, असे ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांचं सरकार 2014 मध्ये आलं. पण हे आव्हान तेव्हाचे नाही तर हा प्रश्न स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच आहे. आणि आम्ही कोणत्याही परिस्थतीत दहशतवाद खपवून घेणार नाही.