महाराष्ट्र

मुंबईत ‘आर. टी. ई.’ अंतर्गत खासगी शाळांमध्ये ६ हजार ५६९ जागा

१७ मार्च अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

मुंबई : शिक्षणाचा अधिकार कायद्यातंर्गत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना नामांकित खासगी विना अनुदानित शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मुंबई जिल्ह्यातील एकूण ३३७ पात्र शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ६ हजार ५६९ जागा उपलब्ध आहेत.
पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन दिनांक १७ मार्च २०२३ पर्यंत पाल्याच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. हा अर्ज महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in (www नाही) किंवा education.maharashtra.gov.in (www नाही) या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर ‘विद्यार्थी’ (Student) या जोडणी अंतर्गत उपलब्ध असणा-या आरटीई पोर्टलवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाचा आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना तडवी यांनी सांगितले आहे की, सदर आरटीई अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे ‘अपलोड’ करण्याची आवश्यकता नाही. पालकांना या प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्रात ८३ मार्गदर्शक मदत केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. पालकांनी संबंधित संकेतस्थळावरील हेल्प डेस्क (Help Desk) या विकल्पावर मुंबई बीएमसी (Mumbai BMC) हा जिल्हा निवडून सदर मदत केंद्रांची यादी पहावी. सदर केंद्रांवर मोफत अर्ज भरण्याची सुविधा असून त्याचा पालकांनी लाभ घ्यावा.

तसेच जे पालक ऑनलाईन व मोबाईल ऍप द्वारे स्वतःहून अर्ज करु शकतात, त्यांना मदत केंद्रावर येण्याची आवश्यकता नाही. अर्ज करण्यापूर्वी पालकांनी संकेतस्थळावरील माहिती काळजीपूर्वक वाचावी. तसेच नंतरही या प्रवेश प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी सदर संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी.

ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला आहे, अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. त्याचबरोबर प्रवेश अर्ज भरताना चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. आरटीई प्रवेशाबाबत सविस्तर माहितीसाठी महानगरपालिकेच्या mcgm.gov.in तसेच महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.